15/05/2026
प्री-मॅरेज कौन्सिलिंग : घटस्फोट टाळण्यासाठी आणि नातं मजबूत करण्यासाठी आजची गरज
आजच्या काळात लग्नं मोठ्या थाटामाटात होतात, पण नातं टिकवण्यासाठी लागणारी मानसिक तयारी मात्र अनेकदा अपुरी असते. प्रेम, आकर्षण आणि सोशल मीडियावरील सुंदर चित्रं पाहून लोक लग्नाचा निर्णय घेतात; पण प्रत्यक्ष आयुष्यात जेव्हा जबाबदाऱ्या, अपेक्षा, कुटुंब, आर्थिक प्रश्न आणि वैचारिक मतभेद समोर येतात, तेव्हा अनेक नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो.
आज वाढणारे घटस्फोट, सततचे वाद, भावनिक अंतर आणि तुटणारी नाती यामागे एक मोठं कारण म्हणजे — लग्नापूर्वी महत्त्वाच्या विषयांवर स्पष्ट चर्चा न होणे.
अलीकडेच न्यायालयाने “लग्नानंतर आई-वडिलांसोबत राहायचे की नाही?” हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. हा फक्त कायद्याचा विषय नाही, तर तो नातेसंबंध, जबाबदारी आणि मानसिक तयारीशी संबंधित प्रश्न आहे. रिलेशनशिप कोच म्हणून काम करताना मला अनेक जोडप्यांमध्ये हे स्पष्ट दिसून येते की, लग्नाआधी ज्या गोष्टी बोलल्या गेल्या नाहीत, त्याच नंतर मोठ्या भांडणांचे कारण बनतात.
प्री-मॅरेज कौन्सिलिंग म्हणजे काय?
प्री-मॅरेज कौन्सिलिंग म्हणजे लग्नापूर्वी दोन व्यक्तींनी त्यांच्या नात्याबद्दल, अपेक्षांबद्दल, जबाबदाऱ्यांबद्दल आणि भविष्यातील आयुष्याबद्दल समजूतदारपणे चर्चा करण्याची प्रक्रिया.
हे फक्त “समस्या असलेल्या” जोडप्यांसाठी नसते, तर सुखी आणि स्थिर वैवाहिक आयुष्याची तयारी करणाऱ्या प्रत्येक जोडप्यासाठी आवश्यक असते.
आज अनेक जोडपी लग्नासाठी कपडे, डेकोरेशन, हॉल आणि फोटोशूटची तयारी करतात; पण “आम्ही एकमेकांसोबत आयुष्य कसं जगणार?” यावर मात्र फार कमी चर्चा होते. आणि हाच पुढे जाऊन समस्यांचा पाया बनतो.
प्री-मॅरेज कौन्सिलिंगमधील चार महत्त्वाचे मुद्दे
*१. Economic Understanding (आर्थिक समज)*
अनेक नात्यांमध्ये प्रेम कमी नसतं, पण आर्थिक तणावामुळे सतत वाद निर्माण होतात.
लग्नाआधी खालील गोष्टींवर स्पष्ट चर्चा होणे आवश्यक असते:
दोघांचे उत्पन्न किती आहे?
खर्चाची पद्धत कशी आहे?
बचत आणि गुंतवणूक कशी करायची?
कर्ज किंवा आर्थिक जबाबदाऱ्या आहेत का?
घरखर्च कोण सांभाळणार?
संयुक्त खाते ठेवायचे का?
करिअर आणि पैशांबद्दल दोघांची मानसिकता काय आहे?
काही लोक खर्चिक असतात, काही बचत करणारे असतात. काहींना कुटुंबासाठी पैसे खर्च करणं महत्त्वाचं वाटतं, तर काहींना स्वतःच्या करिअर आणि लाइफस्टाइलला प्राधान्य असतं.
हे फरक आधी समजले नाहीत, तर लग्नानंतर “तू पैशांची कदर करत नाहीस”, “सगळा भार माझ्यावर आहे” असे आरोप सुरू होतात.
आज अनेक जोडपी आर्थिक कारणांमुळे मानसिक तणावात जगताना दिसतात. त्यामुळे आर्थिक पारदर्शकता आणि नियोजन हे नातं टिकवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
*२. Intellectual Understanding (विचारसरणी आणि जीवनमूल्ये)*
प्रेम असलं तरी विचार जुळणं तेवढंच महत्त्वाचं असतं.
कारण आयुष्य फक्त भावना नाही, तर निर्णयांचाही प्रवास आहे.
या टप्प्यात खालील मुद्द्यांवर चर्चा केली जाते:
लग्नानंतर कुठे राहायचं?
संयुक्त कुटुंब की स्वतंत्र?
आई-वडिलांची जबाबदारी कोण घेणार?
करिअरला किती प्राधान्य द्यायचं?
मुलांबद्दल दोघांचे विचार काय आहेत?
धार्मिक, सामाजिक आणि वैयक्तिक मूल्ये काय आहेत?
जीवनशैली कशी हवी आहे?
आज न्यायालयाने उपस्थित केलेला “आई-वडिलांसोबत राहायचे का?” हा मुद्दा याच विभागात येतो.
अनेक वेळा एका व्यक्तीला पालकांची जबाबदारी महत्त्वाची वाटते, तर दुसऱ्याला स्वतंत्र आयुष्य हवं असतं.
लग्नाआधी हे विषय बोलले गेले नाहीत, तर पुढे सतत संघर्ष निर्माण होतो.
याचबरोबर काही जोडपी करिअरबाबत पूर्ण वेगळा विचार करत असतात.
एका व्यक्तीला परदेशात जायचं असतं, तर दुसऱ्याला आपल्या शहरात राहायचं असतं.
अशा छोट्या वाटणाऱ्या गोष्टी पुढे मोठ्या मतभेदांमध्ये बदलतात.
*३. Emotional Understanding (भावनिक समज)*
प्रत्येक व्यक्ती प्रेम व्यक्त करण्याची आणि भावना हाताळण्याची पद्धत वेगळी असते.
काही लोक लगेच बोलून मोकळे होतात, तर काही शांत राहतात.
काहींना सतत भावनिक आधार हवा असतो, तर काहींना वैयक्तिक स्पेस महत्त्वाची वाटते.
प्री-मॅरेज कौन्सिलिंगमध्ये खालील गोष्टी समजून घेतल्या जातात:
राग आल्यावर व्यक्ती कशी प्रतिक्रिया देते?
संवादाची पद्धत कशी आहे?
अपेक्षा किती वास्तववादी आहेत?
मतभेद कसे सोडवले जातात?
भावनिक गरजा काय आहेत?
पार्टनरकडून काय अपेक्षा आहेत?
अनेक नात्यांमध्ये समस्या “प्रेम नसल्यामुळे” नसते, तर “समजून न घेतल्यामुळे” असते.
संवाद नसेल तर गैरसमज वाढतात, आणि गैरसमज वाढले की भावनिक अंतर निर्माण होतं.
आज अनेक जोडपी एकाच घरात राहूनही मानसिकदृष्ट्या खूप दूर गेलेली दिसतात.
याचं कारण म्हणजे — योग्य संवाद आणि भावनिक समज नसणे.
*४. S*xual Understanding (शारीरिक आणि वैवाहिक जवळीक)*
आजही आपल्या समाजात या विषयावर उघडपणे बोलण्यास संकोच केला जातो.
पण वैवाहिक आयुष्यात शारीरिक जवळीक आणि भावनिक कनेक्शन यांचा खूप महत्त्वाचा संबंध असतो.
या विभागात खालील गोष्टींबद्दल समज निर्माण केली जाते:
शारीरिक जवळिकीबद्दल दोघांच्या अपेक्षा काय आहेत?
मर्यादा आणि कम्फर्ट झोन काय आहेत?
प्रेम व्यक्त करण्याची पद्धत काय आहे?
शारीरिक संबंधांबद्दल गैरसमज किंवा भीती आहे का?
पार्टनरच्या भावनिक गरजांना कसं समजून घ्यायचं?
अनेक जोडपी या विषयावर बोलत नाहीत आणि नंतर गैरसमज, नाराजी आणि भावनिक अंतर वाढतं.
काही वेळा पार्टनरला काय आवडतं किंवा काय अस्वस्थ करतं हेच समजत नाही.
यामुळे नात्यात न बोललेला ताण वाढत जातो.
प्री-मॅरेज कौन्सिलिंगमध्ये या विषयाकडे फक्त शारीरिक दृष्टिकोनातून नाही, तर भावनिक जवळीक आणि परस्पर आदराच्या दृष्टीने पाहिलं जातं.
जर तुम्हाला नातं टिकवायचं असेल तर…
लग्न हे फक्त दोन लोकांचं एकत्र येणं नाही; तर दोन विचार, दोन संस्कार आणि दोन कुटुंबांचा प्रवास आहे.
फक्त प्रेम पुरेसं नसतं, तर समज, संवाद आणि तयारीही आवश्यक असते
आज वाढणारे घटस्फोट हे अचानक होत नाहीत; ते छोट्या छोट्या न बोललेल्या मुद्द्यांपासून सुरू होतात.
आणि म्हणूनच, जर तुम्हाला तुमचं नातं अधिक मजबूत, समजूतदार आणि दीर्घकाळ टिकणारं बनवायचं असेल, तर प्री-मॅरेज कौन्सिलिंग ही आजच्या काळाची गरज आहे.
*डॉ. ललितकुमार हेडा*
*आयुर्वेद कन्सल्टंट अँड रिलेशनशिप कोच*