26/04/2026
*आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत सर्व आरोग्य समित्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश*
मुबई (26.04.26) : राज्यातील आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर देखरेख करण्यासाठी व नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या, रुग्ण कल्याण समिती (RKS), जन आरोग्य समिती (JAS), महिला आरोग्य समिती (MAS), ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती (VHNSC), या समित्यांची जबाबदारी महत्वाची आहे. सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगली व परिणामकारक आरोग्य सेवा देण्यासाठी या सर्व समित्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकाना विविध योजनांच्या माध्यमातून आरोग्यसेवा दिल्या जातात. या सर्व लोकहिताच्या योजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात व नागरिकाना अधिक चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आरोग्य समित्यांची भूमिका महत्वाची असते.
ग्रामीण भागासाठी ‘ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती (VHNSC)” व शहरी भागासाठी “महिला आरोग्य समिती (MAS)” कार्यरत आहे. या समित्या स्वच्छता, पोषण, पाणीपुरवठा, तसेच प्राथमिक आरोग्य सेवा देण्यात महत्वाची भूमिका बजावत असतात.
त्याचप्रमाणे “जन आरोग्य समिती (JAS)” व “रुग्ण कल्याण समिती (RKS)” या समित्या आरोग्य संस्थांमध्ये रुग्णकेंद्रित सेवा, सेवेची गुणवत्ता व निधीच्या पारदर्शक वापरासंबंधी लक्ष ठेवण्याची भूमिका बजावतात.
ग्रामीण भागासाठी कार्यरत असलेल्या "ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा स्वच्छता समिती (VHNSC)" मध्ये अशासकीय सदस्य म्हणून ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य (प्राधान्याने महिला), बचत गट, तरुण मंडळ, वन सुरक्षा समिती, महिला मंडळ, सामाजिक संस्था, गरोदर माता, स्तनदा माता, तीनवर्षा पर्यंतचे मुल असलेली माता व शासकिय रुग्णालयात आरोग्य सेवा घेणारे किंवा बरे झालेले दिर्घकालीन आजाराचे रुग्ण यांचा सदस्य म्हणून समावेश असणे अपेक्षितआहे.
शहरी भागासाठी कार्यरत असलेल्या "महिला आरोग्य समिती (MAS)' मध्ये समाजकल्याण, सामाजिक बांधिलकी व नेतृत्व कौशल्य असलेल्या स्थानिक झोपडपट्टी भागातील जास्तीत जास्त वीस महिला सदस्यांचा समावेश अपेक्षित आहे.
ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत "जन आरोग्य समिती" कार्यरत आहे. या समितीमध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा स्वच्छता समिती (VHNSC) अध्यक्ष/महिला सदस्य, महिला बचत गट अध्यक्ष, शालेय आरोग्यदूत, युवाकेंद्र युवा प्रतिनिधी, क्षयरोगमुक्त नागरिक, तसेच एक किंवा दोन मुलानंतर नसबंदी केलेला पुरुष यांचा विशेष निमंत्रित म्हणून समावेश अपेक्षित आहे.
शहरी भागातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी आरोग्य वर्धीनी केंद्र (UPHC/UHWC) मध्ये कार्यरत असलेल्या जन आरोग्य समितीमध्ये स्थानिक नगरसेवक, नागरी स्वराज्य संस्थेतील आरोग्य समिती अध्यक्ष, नेहरू युवा स्वयंसेवक प्रतिनिधी, एनजीओ प्रतिनिधी, महिला आरोग्य समितीचे अध्यक्ष, शालेय आरोग्य दूत, व दोन प्रतिष्ठित नागरिक यांचा समावेश असणार आहे.
ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या जन आरोग्य समितीमध्ये जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत आरोग्य उपससमिती सभापती /सदस्य, उपकेंद्र जनआरोग्य समितीचे अध्यक्ष, नेहरू युवा, युवा स्वयंसेवक प्रतिनिधी, एनजीओ स्वयंसेवी संस्थेचे दोन प्रतिनिधी, क्षयरोगमुक्त नागरिक, एक किंवा दोन मुलानंतर नसबंदी केलेला पुरुष विशेष निमंत्रित असतो. तसेच VHNSC चे अध्यक्ष व महिला सदस्य यांचा आळीपाळीने सदस्य म्हणून समावेश अपेक्षित आहे.
जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या रुग्ण कल्याण समितीमध्ये जिल्हा परिषद आरोग्य सभापती, पंचायत समिती सदस्य, एनजीओ प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, देणगीदार यांचा समिती सदस्या मध्ये समावेश आहे. शहरी भागातील रुग्ण कल्याण समितीमध्ये स्थानिक नगरसेवक व संबंधित कार्यक्षेत्रातील एनजीओच्या प्रतिनिधींच्या समावेश करण्यात आला आहे.
या सर्व समित्यांच्या पुनरुज्जीवन करण्याच्या प्रक्रियेत स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच समाजातील सेवाभावी नागरिक यांनी सहभागी व्हावे. आरोग्यसेवा अधिक परिणामकारक होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असून, समित्यांच्या माध्यमातून स्थानिक गरजा ओळखून अंमलबजावणी तसेच त्रुटीबाबत त्वरीत उपाययोजना केल्यास नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देऊन, नागरिकांचा आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास दृढ होईल असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
समितीमध्ये नियुक्त सदस्यांनी नियमित बैठका घेवून स्थानिक समस्यांवर कृती आराखडे तयार करावेत. सदस्यांचे प्रशिक्षण व क्षमता बांधणी करावी तसेच विविध विभागांमध्ये समन्वय साधावा. सर्व लोकप्रतिनिधी,खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य यांनी या प्रक्रियेत सहभाग घ्यावा. आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी आवश्यक सहकार्य करावे.
राज्यातील सर्वांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमात सहभागी होऊन आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.
Maha Arogya IEC Bureau
Phc Tigaon
Phc Keshori
Phc Bangaon
Phc Indora Bk
Phc Korambhitola
Phc Kati
Phc Chikhali
Phc Dasgaon
Phc Dhabepauni
Phc Kalimati Aam Kalimati
Phc Khodshivani
DrPurushottam Patle
Abhijeet Golhar
Arvindkumar Waghmare
Roshan Raut