26/07/2024
कावीळ म्हणजे काय?
शरीरामध्ये नवीन रक्त जसजसे तयार होत जाते, तसतसे जुन्या रक्तपेशींचा नैसर्गिकरीत्या नाश होतो. यकृत(Liver) या महत्वाच्या अवयवाचे काम या जुन्या रक्तपेशींच्या रक्त द्रव्यांना विरघळवणे आहे. या प्रक्रियेत, रक्तपेशींचे रक्तद्रव्य यकृतात विरघळले जाते आणि त्यातून एक पिवळा पदार्थ तयार होतो, ज्याला बिलिरुबीन (Bilirubin) म्हणतात. बिलिरुबीन हे सामान्यतः यकृताद्वारे नष्ट केले जाते, पण जेव्हा बिलिरुबीनचे रक्तातील प्रमाण मर्यादेबाहेर वाढते, तेव्हा ते शरीराच्या विविध भागांमध्ये साठू लागते. त्यामुळे डोळे, त्वचा, नखे, आणि लघवी पिवळसर दिसू लागतात. ही अवस्था कावीळ म्हणून ओळखली जाते. कावीळ हा एक सामान्य आजार असला तरी, त्याचे योग्य उपचार न केल्यास तो गंभीर समस्यांमध्ये बदलू शकतो, म्हणूनच त्यावर त्वरित उपचार घेणे आवश्यक आहे.
कावीळ होण्यास मुख्य कारणे?
मुख्यतः दूषित पाण्यामुळे कावीळ होण्याचे प्रमाण जास्त दिसते. दूषित पाण्यात कावीळचे विषाणू पसरण्याची शक्यता अधिक असते. पावसाळ्यात अनेक प्रकारचे पाणी एकमेकांत मिसळल्यामुळे ते दूषित व गढूळ होते, आणि असे दूषित पाणी पिण्यामुळे कावीळ होऊ शकते. उन्हाळ्यातही काविळीच्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसते. याचे प्रमुख कारण म्हणजे उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालवते, आणि त्यात काही वेळा गढूळ व सांडपाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित होते. ज्या भागात मुळात पाण्याची टंचाई आहे, त्या भागात हा धोका अधिक असतो. हा आजार जिथे दूषित पाणी व अस्वच्छता आहे, अशा सर्व ठिकाणी आढळतो.
कावीळ विषाणूंचे वर्गीकरण
कावीळ, ज्याला हिपेटायटिस असे म्हणतात, एकूण पाच प्रकारच्या विषाणूंमुळे होते. हिपेटायटिस म्हणजे यकृताला आलेली सूज. या विषाणूंचे A, B, C, D, आणि E असे वर्गीकरण आहे.
कावीळ झाल्याचे प्रमुख लक्षणे कोणती
कावीळ झालेल्या रुग्णाच्या पचनाच्या तक्रारी वाढतात, त्यामुळे त्याला उलट्याही होतात. त्यामुळे रुग्णाचा अशक्तपणा वाढतो आणि त्याला चक्कर येऊ लागते. रुग्णाला सतत झोपावेसे वाटते आणि त्याचा चेहरा आणि संपूर्ण शरीर निस्तेज होते. भूक मंदावते आणि अन्न-पाण्यावरची इच्छा नाहीशी होते. रुग्णाला सतत मध्यम ताप राहतो, डोकेदुखी आणि अंगदुखीही जाणवते. भूक नसणे, मळमळणे, पिवळेपणा ही लक्षणे आधी डोळ्यात दिसतात, आणि नंतर नखे पिवळी दिसतात. लघवी पिवळी होते,. काही रुग्णांच्या शरीरावर खाज सुटते. ही सर्व कावीळ होण्याची प्राथमिक लक्षणे आहेत. यामुळे रुग्णाच्या दैनंदिन जीवनात मोठा अडथळा निर्माण होतो आणि त्याला तातडीने उपचारांची आवश्यकता असते.
काविळीवर उपचार न करण्याचे धोके
कावीळेचे उपचार न केल्यास गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. यामध्ये दीर्घकालीन यकृत रोग, पित्ताशयाचे खडे आणि पित्तवाहिन्यांचे अडथळे यांचा समावेश होतो. नवजात शिशूंमध्ये कर्निक्टेरस होऊ शकतो, जो मेंदूचे नुकसान करतो. यकृताच्या कार्यात अडथळा आल्यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो, रक्त गोठण्याच्या समस्या होऊ शकतात, विटामिनची कमतरता होते आणि पोटात पाणी साचते. सर्वांगीण लक्षणे जसे की थकवा आणि कमजोरी ही देखील उद्भवू शकतात. कावीळेचे त्वरित आणि योग्य उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
आयुर्वेदिक उपचाराकरिता संपर्क :9372489101
रेल्वे स्टेशन नजीक,जयसिंगपूर ४१६१०१, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर