30/01/2026
46 - स्थिरसुखमासनम् -
ज्या (चल किंवा स्थीर) स्थितीत, स्थिरता व सुख यांचा अनुभव येतो त्याला आसन म्हणावे.
आसन विषय समजून घेण्याकरता काही महत्वाच्या मुद्द्यांचा क्रमवार विचार करुया –
1. सामान्यपणे आसन म्हणल्यावर आपल्याला सर्वांगासन, हलसान, भुजंगासन, इ. चित्र डोळ्यासमोर येतात, पण पतंजलींची आसनविषयक संकल्पना वेगळी आहे. येथे ते कोणतीच विशिष्ट शारीरिक स्थिती सुचवत नाहीत. (त्यांच्यामते) स्थिरतेचा आणि सुखाचा अनुभव देणारी कोणतीही स्थिती म्हणजे आसन होय. आपल्याला अनेक स्थितींमधे असा (स्थीर आणि सुख) अनुभव येतो, उदा: झोपाळ्यावर बसून सावकाश झोका घेत रहाणे, सकाळी जाग आल्यावर अंथरुणात लोळत पडणे, समुद्राकडे पहात बसणे, लयबध्द नृत्य करणे वा पहात असणे; तसेच हलासन, भुजंगासन, इ. आसनांतही हा अनुभव येऊ शकतो, पण अगदी थोड्यावेळापुरताच असतो. मुख्य म्हणजे या आसनात शरीरातील विविध क्रियांचा वेग, दिशा बदलते, तसेच शरीराच्या काही भागांवर ताण किंवा दाब असतो म्हणून फारवेळ सुखाचा अनुभव करणे शक्य होत नाही. मग आसन म्हणजे काय?
2. याचे उत्तर गीतेच्या 6 व्या अध्यायात आपल्याला सापडते. योगेश्वर म्हणतात - उपविश्यासने युऩ्जान --- ।।12।। समं काय शिराग्रीवं धारयन्नचलं स्थिर: ----- ।। 13।। अशा स्थितीत बसा ज्यामधे धड, मान व डोके एका रेषेत राहिल.. थोडक्यात आसन म्हणजे अशी स्थिती, ज्यामधे धड, मान व डोके एका रेषेत राहिल व खूप वेळ (किमान 40 मि. कमाल 3 तास) सुखाने व स्थीरपणे बसता येईल. या साऱ्या अटी पूर्ण करणारी मोजकी आसने आहेत, उदा: सुखासन, सिध्दासन, पद्मासन, स्वस्तिकासन, वज्रासन, इ.
3. मात्र, माझ्यामते पतंजलींना शारीरिक स्थितीपेक्षा मानसिक स्थिरतेची अपेक्षा आहे, कारण पतंजलींचा योग हा मनोमय कोषापाशी सुरु होतो. थोडक्यात पतंजली शरीराच्या विशिष्ट स्थितीबाबत सांगत नसून त्यांचा आग्रह सुखानुभव व चित्ताची (मनाच्या) स्थिरतेविषयी आहे.
4. अन्नमय कोष (स्थूल शरीर) कोणत्या स्थितीत आहे यापेक्षा प्राण, मन व बुध्दी (सूक्ष्म शरीर) कोणत्या स्थितीत आहे हे महत्वाचे आहे. थोडक्यात चित्ताची (मनाची व बुध्दीची) स्थिरता व सुखावस्था ही योगातील पुढील प्रगतीकरता महत्वाची आहे.
याचा अर्थ असा नाही की मुद्दा १ व २ मधील स्थितीत स्थिरतेचा आवश्यकताच नाही. प्राणायाम व धारणेच्या सरावाकरता या स्थूल शरीराच्या स्थिरतेचे फार महत्व आहे. मात्र शरीराच्या स्थिरतेचा अत्याग्रह नको तेथून मनाच्या स्थिरतेकडे उडी मारायची आहे म्हणून मुद्दा ३ व ४ स्पष्ट केले आहेत.